शाहूवाडी / भिवंडी : अनैतिक संबंध आणि लग्नाच्या सातत्याने लावलेल्या तगाद्यातून शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या महिला सरपंचाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरेखा शिवाजी न्यारे (वय ४०, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) असे मृत महिला सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश पाटील यांच्यात अनैतिक संबंध होते. सुरेखा यांनी प्रकाशकडे लग्नासाठी तगादा लावून त्याला इशारा दिला होता. याच रागातून प्रकाशने २६ जुलै रोजी सकाळी गावातील शेतात सुरेखा यांचा गळा दाबून खून केला.
हत्येनंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने सुरेखा यांचा मृतदेह स्वतःच्या इको कारच्या डिक्कीत लपवला. त्यानंतर तो मंगळवारी पहाटे भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाकडे पोहोचला.
सकाळी आरोपीने नातेवाईकाला या हत्येबाबत सांगताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिक नारपोली पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून नारपोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी प्रकाश पाटील याच्या मुसक्या आवळल्या.
या धक्कादायक घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यासह परिसरात तीव्र खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.