विशाळगड : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील आंबा वनपरिक्षेत्रात शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका आरोपीला वनविभागाने धाडसी कारवाई करत अटक केली. अनिल कृष्णा जाधव (रा केर्ले पैकी नेर्लेकरवाडी, ता. शाहूवाडी) असे या आरोपीचे नाव असून, शाहुवाडी न्यायालयाने आज त्याला १८ मे पर्यंत चार दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
१४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास मौजे केर्ले येथील कक्ष क्र. १०२९ मध्ये वनविभागाचे पथक गस्त घालत होते. यावेळी डोक्याला टॉर्च लावून हातात बंदूक घेऊन वावरणाऱ्या अनिल जाधवला पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ बोअर बंदूक, जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. वनरक्षक आंबा यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व उपसंचालक स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. "व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विशेष गस्त सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा वनविभागाने दिला आहे. पुढील तपास आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर करत असून वनपाल सुरेश चरापले, राहुल पाटील, श्रीमती मनिषा देसाई, वनरक्षक , कु. अंजली नवले, वाहनचालक व वनमजूर यांनी कारवाईत सहभाग घेतला.