आशिष शिंदे
कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. अशात कोल्हापूर जिल्ह्यातील बालकांवर झालेल्या अत्याच्याराच्या घटनांची संख्या थक्क करणारी आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत बालकांवरील अत्याचाराचे 623 आणि अपहरणाचे तब्बल 1 हजार 130 गुन्हे नोंदवले गेले आहेत.
केवळ लैंगिक अत्याचारच नव्हे, तर जन्मलेल्या निष्पाप जीवांना उघड्यावर सोडून देण्याचे (बालपरित्याग) क्रूर सत्रही जिल्ह्यात सुरूच आहे. गेल्या पाच वर्षांत 9 बालकांना विविध तालुक्यांत उघड्यावर टाकण्यात आले, ज्यात पन्हाळा, शाहूवाडी आणि राधानगरीसारख्या भागांचा समावेश आहे. 2024-25 मध्ये अत्याचाराच्या 135 आणि अपहरणाच्या 254 घटना घडल्या असून, यासोबतच 4 अवैध गर्भपात आणि 4 खुनांच्या घटनांची नोंद आहे. गुन्ह्यांचा हा चढता आलेख पाहता, राजर्षी शाहूंच्या या नगरीत चिमुकले खरोखरच सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
बालकांच्या खुनाच्या घटनाही चिंताजनक
जिल्ह्यात 2024-25 या एकाच वर्षात 8 बालकांचा खून झाला असून, यात 4 गर्भातील जीवांचा (भ्रूणहत्या) समावेश आहे. 2020-21 मध्ये बालकांच्या खुनाचे 5 गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर 2023-24 मध्ये 1 घटना घडली होती.