कोल्हापूर : राज्यभरात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान कॉपीचे गैरप्रकार उघड होत असताना कोल्हापूर विभागीय मंडळाने ‘कॉपीमुक्त परीक्षे’चा आदर्श निर्माण केला आहे. कडक नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रशासनातील समन्वय यांच्या जोरावर विभागात परीक्षा शांततेत व पारदर्शक वातावरणात होत आहेत. सांगली जिल्ह्यातील एक अपवाद वगळता दोन्ही परीक्षेत गैरप्रकारांना जवळपास पूर्णतः आळा बसल्याचे चित्र आहे.
यंदा कोल्हापूर बोर्डाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ ही अभिनव वार्षिक नियोजन पुस्तिका तयार केली आहे. या नियोजनामुळे प्रशासकीय कामकाजासह शैक्षणिक प्रक्रियेतही शिस्तबद्धता आली आहे. 10 फेबुवारीपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेतील विज्ञान शाखेचे मुख्य पेपर पूर्ण झाले असून, उर्वरित शाखांची परीक्षा 11 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर आयटी व जीके विषयांच्या ऑनलाईन परीक्षा निश्चित कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
दहावीची परीक्षा 20 फेबुवारीपासून सुरू होऊन 18 मार्चपर्यंत चालणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, संवेदनशील ठिकाणी व्हिडीओ शूटिंग व ड्रोनद्वारे देखरेख, तसेच सांगली जिल्ह्यात ‘झूम’ ॲपच्या माध्यमातून थेट निरीक्षण अशी बहुआयामी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या दक्षता समिती व मंडळातील समन्वयामुळे भरारी पथके अधिक सक्रिय झाली आहेत.