उत्तूर : आजरा तालुक्यातील उत्तूर परिसर व गडहिंग्लज तालुक्यातील काही गावांना वरदान ठरलेला आंबेओहोळ मध्यम प्रकल्प आज (दि. ६) दुपारी १२.३० वाजता पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यावरून अत्यल्प प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. आंबेओहोळ मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पुढील वर्षभराच्या शेताच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
सन २०२१ ला घळभरणी पूर्ण होऊन धरणात पाणी अडवले गेले. मागील गेली दोन्ही वर्षे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षीही ऑगस्टमध्येच धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पूर्ण होण्यासाठी उत्तूरवासीयांना तब्बल वीस वर्षे वाट पहावी लागली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समन्वयातून व भाजपकडून मिळालेल्या निधीमुळे धरणाची घळभरणी पूर्णत्वास गेली. पण अद्याप काही धरणग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही. तो प्रश्न त्वरित सोडवावा, अशी अपेक्षा धरणग्रस्त अद्यापही करीत आहेत. एक जून पासून आज अखेर १२६७ मी. मी. पाऊस झाला आहे. मागील २४ तासात २० मी.मी. इतका पाऊस झाला आहे.
प्रकल्पांतर्गत ६३७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून आजारा व गडहिंग्लज तालुक्यातील ११ गावांना याचा लाभ मिळाला आहे. सात गावातील १३९३ हेक्टर पीक क्षेत्र सिंचित होत आहे. उर्वरित ४९६६ हेक्टर क्षेत्र कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून होणाऱ्या पाणीसाठा द्वारे सिंचित होणार आहे. धरणावर एकूण सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.
हेही वाचा