कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया मंगळवारी रात्री पूर्ण झाली. नवी दिल्ली येथील केंद्रीय पुरातत्व विभागातील तज्ज्ञांच्या मागदर्शनाखाली अंबाबाई मूर्ती रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छ करण्यात आली. प्रक्रियेनंतर मूर्ती ज्या पाषाणात घडवली आहे त्या पाषाणाचा मूळ नैसर्गिक रंग दिसू लागला, तसेच मूर्ती अधिक रेखीव झाली, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.दरम्यान, तज्ज्ञ समितीच्यावतीने संवर्धन प्रक्रियेतील तपशील व मूर्तीची सद्यस्थिती याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना बुधवारी देण्यात येणार आहे.
पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती यांच्यामध्ये अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाबाबत झालेल्या चर्चेनुसार सोमवारी (दि. 11 ) व मंगळवारी (दि. 12 ) संवर्धन प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री साडेआठ वाजता केंद्रीय पुरातत्व विभागातील तज्ज्ञ कोल्हापुरात दाखल झाले. पथकात विभागाचे उपअधीक्षक डॉ. विनोदकुमार, निलेश महाजन, सुधीर वाघ व मनोज सोनवणे या तज्ज्ञांचा समावेश होता. सोमवारी रात्री उशीरा पथकाने अंबाबाईच्या मूर्तीची भिंगाद्वारे पाहणी केली होती. मंगळवारी सकाळी मुख्य संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मंदिराच्या गर्भकुडीतील आर्द्रतेचा परिणाम मूर्तीवर झाल्याने दिसणारे पांढरे ठिपके संवर्धनानंतर दूर झाले. मूर्तीवरील सर्व बारकावे स्पष्ट दिसू लागले. पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या धर्तीवर दर सहा महिन्यांनी अंबाबाई मूर्तीची नियमित संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
गेले दोन दिवस संवर्धन प्रक्रियेच्या कारणास्तव अंबाबाईचा मुख्य गाभारा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे मूळ मूर्तीच्या दर्शनाऐवजी उत्सवमूर्ती व देवीतत्व कलश पेटी चौकात प्रतिष्ठापित करण्यात आला होता. आता संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बुधवारी समितीने सूचविलेल्या सूचनांची पूर्तता केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी आजही मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. गुरुवार, दि. 14 रोजी सकाळी पुन्हा धार्मिक विधी केले जातील आणि दुपारी 12 नंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी खुले होईल.