कोल्हापूर : कोल्हापुरात रस्ते, विमान सेवांचा विस्तार होत असून, उद्योगधंद्यांची निर्मिती आणि वाढीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण निर्माण होत आहे. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक तयार करून स्थानिक युवकांना रोजगार निर्मिती होईल, याकरिता कोल्हापूर हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे डेस्टिनेशन होण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
जिल्हा उद्योग व सेवा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी जिल्हा गुंतवणूक परिषद झाली, यावेळी ते बोलत होते. आमदार अशोकराव माने प्रमुख उपस्थित होते. डॉ. राठोड म्हणाले, स्थानिक उद्योग व उद्योजकांच्या अडचणी जाणून घेणे, त्यावर चर्चा विचार विनिमय करून त्या सोडवण्याच्या दृष्टीने ही जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होत आहे. आमदार माने म्हणाले, उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. उद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी आर्थिक उन्नती साधावी.
उद्योग व सेवा विभागाचे सहआयुक्त संदीप रोकडे म्हणाले, जिल्ह्यात सूक्ष्म, लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांसाठी आणि विस्तार करणाऱ्या उद्योगांसाठी सुद्धा मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. उद्योगांना भांडवल आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि उद्योगांचा विस्तार व्हावा, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्किट बेंच अंबाबाई विकास आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत आहे. जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात होणारी गुंतवणूक ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे ‘कोल्हापूर फर्स्ट’चे सुरेंद्र जैन यांनी सांगितले. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कोल्हापूर उद्योग व सेवा विभागाच्या उपायुक्त डॉ. विद्या कुलकर्णी, मैत्री विभागाचे नोडल अधिकारी विनायक लोंढे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार, माजी आमदार सुजित मिणचेकर, संबंधित विभागांचे अधिकारी, उद्योजक उपस्थित होते. यावेळी उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. जिल्हा उद्योग पुरस्कार प्रदान करत उद्योजकांना गौरविण्यात आले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँक अधिकाऱ्यांचा सन्मान झाला.