कोल्हापूर

कोल्हापूर : कडवी धरणात ५६ टक्के पाणीसाठा; उपसाबंदी नसल्याने समाधान

मोहन कारंडे

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : कडवी मध्यम प्रकल्पात ५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अवलंबित २२ गावांना टंचाई जाणवणार नाही. सध्यातरी पाणी उपसाबंदी करण्यात आलेली नाही. सुयोग्य व्यवस्थापनामुळेच पावसाळ्यापूर्वी प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याचे सांगण्यात आले.

कडवी धरणाची २.५१ टीएमसी क्षमता आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पाणीपातळी ६०१.२५ मीटर, तर पाणीसाठा ७१.२४ दलघमी असतो. यंदा कडवी मध्यम प्रकल्पात १.४० टीएमसी (५६.०४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात १.२४ टीएमसी पाणीसाठा होता. परळे- निनाई ते पाटणे बंधारादरम्यानच्या २२ गावांतील लाभक्षेत्राला सिंचन व पाणी पिण्यासाठी महिन्याकाठी दहा टक्के पाणी लागते. पाटबंधारे विभागाने कडवी नदीवर सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिरगाव, सवते-सावर्डे, पाटणे अशा आठ ठिकाणी पाणी साठवणुकीसाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभे केले आहेत. भेंडवडे, परळे-निनाई, पुसाळे, आळतूर, करूंगळे, लोळाणे, निळे, वालूर, कडवे, येलूर, पेरीड, मलकापूर, गाडेवाडी, कोपार्डे, अशी एकूण २२ गावे या कडवी प्रकल्पावर अवलंबून आहेत.

कडवी मध्यम प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जूनअखेर सुमारे ४० टक्के पाणीसाठा शिल्लक राहील, असे नियोजन करण्यात आले आहे. अद्याप पाणी उपसाबंदी लागू केली नसून सिंचन व पिण्यासाठी मुबलक पाणीसाठा प्रकल्पात आहे.
– अजय पुनदीकर, शाखा अभियंता, कडवी धरण

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT