कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील आंदोलनाने रविवारी तीव्र स्वरूप धारण केले. प्रशासनाने गावकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी दिले. आंदोलन मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली; मात्र न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली. गावबंद, पर्यटकांना प्रवेशबंदी यासोबतच सोमवारपासून शाळाही बंद ठेवून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची भूमिका ग्रामस्थांनी जाहीर केली आहे.
पिढ्यान् पिढ्या असलेल्या घरांवर अतिक्रमणाचा शिक्का मारणे अन्यायकारक आहे. पुरातत्त्व विभागाचे नियम मंदिर आणि मंदिराच्या तटबंदीपुरतेच मर्यादित ठेवावेत, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशाराही दिला. यावेळी गणेश पाखरे, दयानंद खानोरे, कुलदीप कदम, हिदायत मुजावर यांच्यासह ग्रामस्थ म्हणाले हा लढा हक्काच्या घरांसाठी आणि अस्तित्वासाठी आहे. आंदोलनस्थळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे, शेतकरी संघटनेचे स्वरूप पाटील, विक्रम पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.