कोल्हापूर : श्रीक्षेत्र जोतिबा परिसर विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक मंगळवारी (दि. 22) सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईत मुख्य सचिवांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत जोतिबा विकास आराखड्यावर सकारात्मक चर्चा होऊन अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
एक हजार 804 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. पन्हाळा येथील कार्यक्रमात या आराखड्यास निधी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे जोतिबा विकास आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यास वित्त विभागाने परवानगी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात आराखड्याचे नियोजन केले आहे. 1 हजार 804 कोटी रुपयांपैकी 1 हजार 37 कोटी रुपयांचा राज्य शासनाचा सहभाग असून, 767 कोटी इतर विभागातून उपलब्ध केले जाणार आहेत. चार टप्प्यांत होणार्या आराखड्यात जोतिबा मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या डोंगरातील गावांचा विकास करण्यात येणार आहे.
बैठकीस पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड उपस्थित राहणार आहेत. यापैकी काही अधिकारी प्रत्यक्ष, तर काही अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.