कोल्हापूर : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यासाठी वकिलांच्या तीन पिढ्यांनी लढा दिला. कोल्हापुरात सर्किट बेंच मंजूर करून ४३ वर्षांच्या या लढ्यास सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पूर्णविराम दिला. तेच खरे सन ऑफ सॉईल (भूमिपुत्र) असल्याचे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी कार्यवाहक न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी व्यक्त केले.
कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहात शनिवारी (दि. ११) तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या तैलचित्राचे अनावरण न्यायमूर्ती घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय अहुजा, वृषाली जोशी, शैलेश ब्रह्मे, मेहरोज अशरफ खान पठाण, नंदेश देशपांडे, संदेश पाटील, जिल्हा न्यायाधीश ए. एम. पाटील, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल प्रमुख उपस्थित होते. तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक प्रयत्न कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने केला आहे. जिल्हा न्यायालयातील गवई यांचे तैलचित्र वकिलांना नेहमीच प्रेरणा देईल, अशी भावना घुगे यांनी व्यक्त केली.
आंदोलनातील वकिलांची फोटो गॅलरी
खंडपीठाच्या लढ्यामध्ये जिल्ह्यातील अनेक वकिलांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर बारमध्येही जुना वकिलांच्या फोटोची गॅलरी करण्याची सूचना घुगे यांनी केली.
कोल्हापूरातच स्थायिक होणार
न्यायमूर्ती घुगे यांनी कोल्हापुरातील शालेय जीवनापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. येथील मातीमधील प्रेमामुळे निवृत्तीनंतर येथेच स्थायिक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.