कागल : कागलकरांनो, गद्दार हसन मुश्रीफांना पाडा व निष्कलंक समरजितसिंह घाटगेंना निवडून आणा. मंत्रिपदाची चिंता करू नका, कागलला त्यांच्या मंत्रिपदाच्या बदली समरजितना मंत्रिपद देण्याचा शरद पवारांनी पूर्ण ताकतीने शब्द दिला आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. कागल येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचाराच्या भव्य सांगता सभेत ते बोलत होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, कागलमध्ये परिवर्तनाचा मोठा अंडरकरंट दिसत आहे. वडिलांसमान 84 वर्षाच्या याद्ध्याने सदाशिवराव मंडलिक यांचा रोष पत्करून मुश्रीफांना सर्व काही देऊनही पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. शिवरायांनी गद्दारीला माफी दिली नाही. हा इतिहास साक्षी ठेवून शरद पवारांशी गद्दारी केलेल्या हसन मुश्रीफांना पाडलच पाहिजे. उमेदवार समरजित घाटगे म्हणाले, शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना निष्ठेवर निर्माण केले. गद्दारी केल्यावर त्यांना कडक शासनही केले. या महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र धर्म विसरून गद्दारी केली, त्यांना त्या त्या वेळी महाराष्ट्राने धडा शिकवला आहे. आजही या गद्दारांना गाडल्याशिवाय ही जनता राहणार नाही.
जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी, म्हणाल्या, तुम्हाला ईडीची नोटीस आली की, नाही? तुम्हाला तुरुंगावास होणार होता की नाही? पक्ष फोडला की नाही? शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही? या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग मतदान मागायला या. यावेळी सरोज पाटील म्हणाल्या, जी मंडळी शरद पवारांना सोडून गेली त्या ठिकाणच्या सभा विक्रमी गर्दीत पार पडत आहेत. त्यामुळे कागलमध्ये मुश्रीफांच्या विरोधातील जमावाच्या साक्षीने हसन मुश्रीफ गाडले जाणार हे निश्चित झाले आहे.
यावेळी प्रवीण राजे घाटगे, कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, बाबासाहेब पाटील, नवोदिता घाटगे, सौ. नंदितादेवी घाटगे, राजे वीरेंद्र सिंह घाटगे, श्रेयादेवी घाटगे, दिग्विजय कुराडे, संभाजी भोकरे, सागर कोंडेकर, शिवानंद माळी, अभिषेक शिंपी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, सुरेश कुराडे, ईगल प्रभावळकर, अनिल घाटगे, कृष्णात पाटील, बाळासाहेब हेगडे, अक्षय घस्ते, संदीप देसाई, शिवाजी कांबळे, सुयश कांबळे, सौ. किरण तोडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत राजू जाधव यांनी केले. संजय पाटील यांनी आभार मानले.