वारणानगर : जनसुराज्य शक्ती पक्ष राज्यात विधानसभेच्या १२ ते १५ जागा लढविणार असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार व सांगली जिल्ह्यातील दोन जागांचा समावेश आहे. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख आणि जनुसराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात १२ ते १५ जागा मिळाव्यात, अशी मागणी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
लवकरच महायुतीच्या नेत्यांकडे ही मागणी ते करणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० पैकी शाहूवाडी, हातकणंगले, करवीर व गडहिग्लज या चार जागा तर सांगली जिल्ह्यातील मिरज व जत दोन जागा मिळाव्यात, अशीही त्यांची मागणी आहे.
जनसुराज्य पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चार आमदार निवडून आले होते. नंतर ही संख्या कमी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात तत्कालीन सरकारला पाठिंबा देऊन कोरे यांनी अपारंपरिक ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्रिपदही मिळवले होते. मात्र २०१४ नंतर ते महायुतीसोबत आहेत.
कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा, शाहूवाडीसह हातकणंगले, चंदगड, शिरोळ, गडहिंग्लज, आजरा तर सांगली जिल्ह्यातील मिरज व जत तालुक्यांत जनसुराज्य शक्तीची ताकद आहे.