कोल्हापूर : जिल्हा उद्योग व सेवा विभागाच्या वतीने शुक्रवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद झाली. या परिषदेत २०३ उद्योजकांसोबत ६ हजार १०५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून २० हजार ८३५ रोजगारांची निर्मिती होणार आहे.
आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पुणे उद्योग व सेवा विभागाचे सहआयुक्त संदीप रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद झाली. डॉ. राठोड म्हणाले, जिल्ह्यात २०२५ मध्ये ४ हजार १५६ कोटींची गुंतवणूक झाली. १४७ उद्योगांचे सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी ८८ उद्योग घटकांचे उत्पादन सुरू झाले. यातून एक हजार ४८९ कोटींची गुंतवणूक आणि 3 हजार ४६५ रोजगार निर्माण झाले आहेत. यावर्षी २०२६ मध्ये ६ हजार १०५ कोटींची गुंतवणूक झाली असून यातून २० हजार ८३५ रोजगार निर्मिती होईल.
यावेळी आ. माने यांनी उद्योग क्षेत्राची कार्यक्षमता वाढवणे काळाची गरज आहे. यादृष्टीने आजची जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी आणि रोजगार निर्मितीला गती देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत युवकांनी नोकऱ्या मागणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे व्हावे, असे आवाहन केले.