आशिष शिंदे
कोल्हापूर : एकेकाळी रस्ते, पूल आणि बोगदे उभारण्यासाठी अनेक वर्षे लागत असत. मात्र अत्याधुनिक यंत्रसामग््राी आणि स्वदेशी तंत्रज्ञानामुळे भारत आज जागतिक ‘इंजिनिअरिंग हब’ म्हणून उदयास आला आहे. प्री-कास्ट आणि सेगमेंटल कन्स्ट्रक्शनमुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा वेग 5 ते 10 पटींनी वाढला आहे. याच तंत्रक्रांतीतून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकसारखा प्रकल्प साकार झाला असून, त्यात जगातील सर्वात रुंद बोगदा आणि देशातील सर्वात उंच केबल स्टेड पूल उभारला आहे.
निसर्गाच्या कठीण आव्हानांवर मात करत भारताने अनेक ‘इंजिनिअरिंग मार्व्हल्स’ उभे केले आहेत. 10 हजार फुटांवरील जगातील सर्वात लांब हायवे बोगदा असलेला ‘अटल टनेल’, आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच ‘चिनाब रेल्वे पूल’ आणि 18 किलोमीटरहून अधिक लांबीचा ‘अटल सेतू’ भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याची साक्ष देतात.
पूर्वी बांधकाम प्रत्यक्ष जागेवर केले जात असे. आता मात्र पुलांचे मोठे भाग आणि इमारतींच्या भिंती फॅक्टरीमध्ये तयार करून ‘लाँचिंग गर्डर’सारख्या महाकाय यंत्रांनी जोडल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा न आणता मेट्रोचे खांब, उड्डाणपूल आणि सेतू कमी वेळेत उभे राहात आहेत.
बोगदे खोदण्यासाठी भारतीय बनावटीच्या ‘टनेल बोरिंग मशिन्स’ आणि ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. इमारत बांधकामात ‘मिवाण’ ॲल्युमिनियम फ्रेमवर्कमुळे 30-40 मजली इमारती अवघ्या 1-2 वर्षांत पूर्ण होत आहेत. भविष्यात थ्री डी काँक्रिट प्रिंटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भारतीय अभियांत्रिकी क्षेत्र आणखी प्रगत होणार आहे.