कोल्हापूर : साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे. या उपउत्पादनातून मिळणारा जादाचा निधी कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी उपयोगात आणला जाईल, असे सांगत देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी कागल येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे आहे. इथेनॉलशिवाय कारखानदारी टिकवणे अवघड आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असल्या तरी त्याबाबत पेट्रोलियम किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून राहिली असून, ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.