हुपरी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीमुळे चांदी दरात सातत्याने भरघोस वाढ होत असून सध्या चांदीचा दर प्रतिकिलो सव्वातीन लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे. परिणामी देशांतील बाजारपेठेवरील दागिन्यांची मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यापुढील कालावधीत चांदी व्यवसायाचे भविष्य अंधःकारमय झाले असून खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे करायचे, अशा विवंचनेत हुपरी व परिसरातील चांदी व्यावसायिक सापडला आहे.
चांदी दरात सातत्याने होत असलेली ही न भूतो न भविष्यती अशी दरवाढ सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या येथील चांदी व्यावसायाचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. चांदी दरात सातत्याने होणारी ही वाढ संपूर्ण चांदी व्यवसायाच्या जणू मुळावरच उठल्याने काही व्यावसायिकांनी आपले व्यवहार काही काळासाठी बंद ठेवणे पसंत केले आहेत. तसेच कुशल कारागीरही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा रस्ता धरल्याचे पाहावयास मिळत आहे.
चांदीच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने चांदीची विक्री करून नफा मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत. पण एवढ्या दरात खरेदी करणारे कोणीही पुढे येत नाही. हुपरीसह परिसरातील आठ-दहा गावांचा चांदी दागिने बनविणे हाच प्रमुख व्यवसाय असून सध्या या व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मंदी आल्याने परिसरातील सर्व प्रकारचे अर्थचक्र पूर्णपणे थांबले गेले आहे. परिणामी चांदी उद्योगासह इतर सर्वच पूरक व्यावसायिकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे.