राजेंद्र जोशी
कोल्हापूर : सुमारे ३६ वर्षे रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी पुन्हा सर्वेक्षण केले जाईल आणि त्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी स्पष्ट केल्याने हा प्रस्तावित मार्ग किती दिवस सर्वेक्षणाच्या फेर्यात अडकणार असा सवाल उपस्थित होत आहे.
रेल्वेच्या विकासकामांच्या चर्चेसाठी पुण्यात पुणे व सोलापूर विभागातील खासदारांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली पण कोल्हापूर आणि कोकण यांना जोडणार्या या मार्गासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याने हा मार्गे सर्वेक्षण, डीपीआर, मंजुरीच्या फेर्यातच अडकणार असे संकेत मिळत आहेत. श्रीवास्तव यांच्या या उत्तरावर रेल्वे मार्गाच्या लाभक्षेत्रामध्ये येणार्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे.
(पूर्वार्ध)
दै. ‘पुढारी’चा १९९० पासून पाठपुरावा
दै. ‘पुढारी’ने १९९० मध्ये कोकण विकासाविषयी एक मालिका प्रसिद्ध केली होती. या मालिकेत कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाचा आग्रही पुरस्कार केला आणि दै. ‘पुढारी’चे संपादक ग. गो. जाधव यांनी या प्रश्नाला व्यापक स्वरूप दिले. कोल्हापूर-वैभववाडी दरम्यान १०३ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाविषयी १९९९ मध्ये तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी संसदेत आवाज उठविला आणि या प्रकल्पासाठी एक रुपयाचे अर्थसंकल्पीय शीर्ष तयार करणे सरकारला भाग पाडले. त्यावेळी केंद्र शासनाने कोकण रेल्वेला जोडणार्या या महत्त्वपूर्ण मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले. यानुसार आजपर्यंत ७ सर्वेक्षणे पूर्ण झाली आहेत. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचा भूमिपूजन सोहळाही झाला. आता रेल्वे प्रशासनाला या प्रकल्पासाठी आणखी एक सर्वेक्षण कशासाठी हवे आहे? दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील जनतेला याचे स्पष्ट उत्तर मिळाले पाहिजे.