कोल्हापूर : सातारा येथील पुरवठा अधिकारी संदीप पाटील (रा. सांगावकर मळा) यांचा शिंगणापूर (ता. करवीर) येथील बंगला फोडून ४० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लूटणाऱ्या राजारामपुरी येथील उच्चशिक्षित टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. संशयितांनी बंद बंगल्यांना टार्गेट करून फोडण्याचा प्लॅन रचला. मिळालेल्या पैशांतून त्यांची चैनीखोरीची पोलिसांना माहिती मिळाली.
पथकाने म्होरक्यासह तिघांना अटक करून १२ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. म्होरक्या आदित्य संजय चौगुले (वय २६, रा. दौलतनगर, सध्या शिंगणापूर), विनोद शिवाजी कलकुटगी (३०, शाहूनगर, राजारामपुरी), शुभम राजेंद्र हेगडे (२८, शाहू मिल चौक, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १५० ग्रॅम चांदीचे दागिने,१८ हजारांची रोकड असा १२ लाख ४६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.
संशयित तरुण जिवलग मित्र असून, तिघेही उच्चशिक्षित आहेत. तिघांचेही आई-वडील मजुरी करतात. आर्थिक अडचणीमुळे आदित्यने घरफोडी, चोऱ्या करून पैसे कमावण्याचा प्लॅन रचला. त्यानुसार संदीप पाटील यांचा शिंगणापूर येथील बंद बंगला गुरुवारी (दि. ४) फोडला. उपनिरीक्षक जालिंदर जाधव, हवालदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, अमित सर्जेंसह पथकाने चोरट्यांचा छडा लावून त्यांना जेरबंद केले. संशयित प्रथमच रेकॉर्डवर आले असले, तरी यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता का, याची कसून चौकशी सुरू आहे, असे सुशांत चव्हाण यांनी सांगितले.