कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी रविवारी झालेल्या २० गुणांच्या ऑनलाईन टंकलेखन कौशल्य (टायपिंग स्किल) परीक्षेत विद्यार्थांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, बहुतांश विद्यार्थी नापास झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे रजिस्टार व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांना पुनर्परीक्षा घेण्याचे निवेदन दिले.
मुंबई उच्च न्यायालयाकडून डिसेंबर-२०२५ मध्ये अकरा हजार लिपिक, टंकलेखक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या पदांसाठी लेखी परीक्षा एप्रिलमध्ये झाली. दीड लाख विद्यार्थी राज्यभरातून परीक्षेला बसले होते. लेखी परीक्षा उत्तीर्ण ११ हजार विद्यार्थ्यांची टायपिंग परीक्षा रविवारी (दि. १७) राज्यभरातील परीक्षा विविध केंद्रांवर झाली. कोल्हापुरातील तीन परीक्षा केंद्रांवर ६७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मात्र, परीक्षा केंद्रांवर सुविधांची कमतरता होती.
परीक्षा केंद्रांवर टायपिंग परीक्षेसाठी दिलेल्या संगणक स्क्रीनचा आकार कमी-जास्त होता. स्क्रीनचे रंगदेखील सारखे बदलत होते. की-बोर्डवर एक अक्षर दाबल्यास दुसरेच अक्षर तिथे येत होते. पूर्णविराम व स्वल्पविराम यांसारखी विरामचिन्हे स्पष्टपणे दिसत नव्हती. संगणक अचानक बंद पडणे, वेळ संपण्यापूर्वीच उत्तरपत्रिका सबमिट होणे अशा अडचणी आल्या. विद्यार्थ्यांनी की-बोर्ड बदलून मागितले, तरीही परीक्षा केंद्राकडून देण्यात आले नाहीत. परीक्षा केंद्रावर उपस्थित पर्यवेक्षकांना अडचणी सांगूनही विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. यातून तत्काळ मार्ग काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.