कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत राधानगरीसह जिल्ह्यातील 15 धरण क्षेत्रांत व मलकापूर, गगनबावडा, राधानगरी, सरवडे, कसबा तारळे, कोतोली येथे अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील 49 बंधारे पाण्याखाली गेले असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. शहरात गुरुवारी दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या.
49 बंधारे पाण्याखाली; सर्वाधिक पाऊस गगनबावड्यात
पाणलोट क्षेत्रात जोर; शहरात हलक्या सरी
राधानगरी धरण 62.82 टक्के भरले
राधानगरी धरण 62.82 टक्के भरले असून धरणातून 1400 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. हिरण्यकेशी नदीवरील पेरणोली देवकांडगाव-हरपवडे मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 16 धरण क्षेत्रांपैकी 15 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये राधानगरी (136 मि. मी.), तुळशी (146), वारणा (85), दूधगंगा (88), कासारी (153), कडवी (145), कुंभी (165), पाटगाव (245), चिकोत्रा (98), चित्री (110), जंगमहट्टी (70), घटप्रभा (105), जांबरे (110), सर्फनाला (116), कोदे (117 मि. मी.) येथे पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी 22 फूट 3 इंचांवर पोहोचलेल्या पंचगंगेच्या पाणीपातळीत 4 फुटांची वाढ होऊन गुरुवारी रात्री 9 वाजता पाणीपातळी 26 फूट 3 इंचांवर पोहोचली होती.
चंदगड : चंदगड तालुक्याची हरितक्रांती करणारा जंगमहट्टी प्रकल्प गुरुवारी रात्री 9 वाजता पूर्ण क्षमतेने भरला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. धरणातून प्रति सेकंद 140 कुसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेल्या वर्षी 7 ऑगस्टला प्रकल्प पूर्ण भरला होता. मात्र आता हे धरण पूर्ण क्षमतेने 20 दिवस आधीच भरले असून त्यामध्ये 726.20 दशलक्षघनफूट पाणीसाठा झाला आहे.
शिवाजी पेठ येथील आठ नंबर शाळेजवळ गुरुवारी मोठे झाड कोसळल्याने काही दुचाकींचे व सायकलींचे नुकसान झाले. जिल्हा आपत्ती विभागाच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 3 लाख 90 हजार रुपयांच्या 11 खासगी मालमत्तेचे नुकसान झाले. यामध्ये 2 पक्क्या घरांची व 9 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली.