कोथळी : येथील संगमावर वारणा व कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर असे पसरलेले आहे.  Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur : जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम

अनेक ठिकाणी जनावरांच्या चार्‍याचीही अडचण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम होता. तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने शिवारात चिखल झाला असून शेतीकामांवर पाणी फेरले आहे. अनेक ठिकाणी जनावरांच्या चार्‍याचीही अडचण झाली आहे.

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली होती; परंतु सायंकाळनंतर पुन्हा सुरुवात केल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले असून खरिपाच्या पेरण्या कशा करायच्या, असा प्रश्न आहे.

निगवे खालसा : भुईमूग, सूर्यफूल, तीळ आणि नाचणीसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने पिके शेतातच भिजून गेली. सूर्यफूल पिकांना कोंब फुटले आहेत.

गगनबावडा : तालुक्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत आलेल्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा अनुभव मिळत आहे. ऊस भरणी व चारा साठवणीची कामे अपूर्ण राहिली आहेत.

इचलकरंजीत पंचगंगा पातळीत वाढ

इचलकरंजी : शहर व परिसरात दुपारनंतर संततधार सुरूच होती. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पंचगंगेच्या पातळीतही वाढ होत आहे. नदीतील बंधारा पाण्याखाली गेला असून पहिल्या घाटावर पाणी आले आहे.

गडहिंग्लजला बाजाराकडे पाठ

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरासह तालुक्यात सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. रविवारी आठवडा बाजार होता; मात्र पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली. व्यापार्‍यांचीही निराशा झाली. छत्री, रेनकोट विक्रेत्यांची उलाढाल वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT