कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने पक्षी, प्राणी घायाळ झाले आहेत. काही पक्षी कायमचे जायबंदी, तर काही जखमी होऊ लागले आहेत. पांजरपोळ येथे 4 घारींसह एक माकड, बदक आणि खारीच्या दोन पिल्लांवर उपचार सुरू आहेत. या सर्वांवरील उपचार सध्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यांना नैसर्गिक आदिवासात सोडले जाणार आहे. गेल्या आठवडाभरापासून उष्माघातामुळे घायाळ होऊन पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
कडाक्याचे ऊन आणि उष्णतेमुळे पक्ष्यांचे हाल होऊ लागले आहेत. अस्तित्वात असणारा पक्ष्यांचा अधिवास कायम ठेवून भविष्यात पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायचा असेल, तर टेरेस आणि अंगण अथवा जिथे पक्षी येतात त्या ठिकाणी पाण्याचे भांडे आणि खाण्यासाठी खाद्यपदार्थ ठेवणे गरजेचे आहे. उन्हाचा पारा वाढू लागल्याने पक्ष्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. जायबंदी पक्षी-प्राण्यांवर पांजरपोळ येथे डॉ. राजकुमार बागल स्वखर्चातून तसेच दानशूर व्यक्तींच्या मदतीने उपचार करत आहेत.