कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ संदर्भातील पाच याचिकांवर सोमवारी (दि.१०) सर्वोच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच आणि सहकार न्यायालयात सुनावणी होत आहे. गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने या तीनही सुनावणी महत्त्वपूर्ण असल्याने गोकुळसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोकुळची निवडणुक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीत न झाल्याने हसूर (ता. करवीर) येथील कै. राऊ सखाराम पाटील दूध संस्थेने सहकार निवडणूक प्राधिकरण व दुग्ध विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे, तर राज्य सरकारने गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळण्याबाबत अर्ज केला आहे. वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनीही गोकुळ सलग्न दूध संस्थांसंदर्भात दुग्ध विभागाच्या अधिकार्यांसमोर सुरू असलेल्या सुनावण्या, चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या, अशी मागणी केली आहे. या तीनही याचिकांवर आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी होत आहे.
सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी अवसायनात काढलेल्या ६४४ दूध संस्थांपैकी १९३ संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय न्यायालय आज देणार का, याकडेही लक्ष असणार आहे. तसेच बेलवाडे यांनी गोकुळने ४१० दूध संस्थांना चुकीच्या पद्धतीने सभासदत्व दिले असल्याने या संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत सहकार न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे.