कोल्हापूर : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी स्वत:ला आवरावे, त्यांच्या पूर्वायुष्याची आम्हालाही संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुरू असलेली बदनामी थांबवावी, अन्यथा शिवसेनेच्या ज्यांच्यावर त्यांनी टीका केली, त्यांना सोबत घेऊन पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन थेट विचारणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकाव्दारे सांगितले.
पत्रकात म्हटले आहे, चंदगडचे जे आमदार आहेत त्यांचे शिक्षण किती, त्यांचे पूर्वायुष्य काय, त्यांनी जीवनातील दिवस कुठे खर्ची घातलेत, याचीही सविस्तर माहिती आम्हाला आहे. खरेतर मी त्याबद्दल फारसे काही बोलणारच नव्हतो. परंतु, ते नाहकरित्या सातत्याने जाणीवपूर्वक माझ्यासह नवीद मुश्रीफ यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करत आहेत. एकदाचा त्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्यांना शेवटचे उत्तर देत आहे. त्यानंतर त्यावर बोलणार नाही. त्यांनी हे जर थांबवलं नाही, तर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात घेतलेल्या एका सभेमुळे त्यांच्या आठ जागा पडल्या हे त्यांचे दुःखही मी समजू शकतो. परंतु, ते ज्या पद्धतीने नाहक बदनामी करत आहेत. त्यामुळे आमचे लोक संतप्त झाले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.