सिद्धनेर्ली : येथील जाहीर सभेत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. समोर उपस्थित ग्रामस्थ 
कोल्हापूर

समरजितनी शक्तिपीठची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास निवडणुकीतून माघार

Maharashtra Assembly Election : पालकमंत्री मुश्रीफ यांचे आव्हान; सिद्धनेर्लीतील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

सिद्धनेर्ली : शक्तिपीठ महामार्गाच्या रूपाने शेतकर्‍यांवर भूमिहीन होण्याचे संकट ओढवले होते. शेतकर्‍यांमधील उद्रेक आणि संतप्त भावना लक्षात घेऊन सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करून कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना काढून घेतली. ही अधिसूचना खोटी आणि फसवी असल्याचा अपप्रचार समरजित घाटगे करीत आहेत. त्यांनी ती अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास अजूनही निवडणुकीतून माघार घेतो, असे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील जाहीर प्रचार सभेत मंत्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, डबल हॅट्ट्रिक करण्याची संधी मला द्यावी. लोकहिताच्या व जनकल्याणाच्या द़ृष्टीने चांगले निर्णय घेण्याची शक्ती जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वराने द्यावी.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, सिद्धनेर्लीत समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत जयसिंगराव घाटगे पतसंस्थेचे मॅनेजर तानाजी जालिंदर पाटील यांचे दहा महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या नावाची कर्ज प्रकरणे दाखवून मृत्यूनंतर त्यांच्यावर भ—ष्टाचाराचे आरोप करून एक कोटी 85 लाखांची वसुली लावली. मी त्या अन्यायग्रस्त कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभा आहे. या प्रकरणात हात असलेल्या घाटगे यांच्या म्होरक्यांचा पर्दाफाश करणार.

शुभांगी पाटील, सायली आगळे, भाजप तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. दादासो पाटील यांनी स्वागत केले. एम. बी. पाटील, व्ही. जी. पवार, राहुल महाडिक, विनायक आगळे, सरपंच दत्तात्रय पाटील, कृष्णात मेटील, पूनम मगदूम-महाडिक, सुरेखा पाटील, मनोहर लोहार, संदीप पाटील, रामजी घराळ, कबीर कांबळे, वनिता घराळ, कल्याणी कुरणे उपस्थित होते.

हिम्मत असेल तर यावर बोला...

मंत्री मुश्रीफ म्हणाले, सिद्धनेर्लीतील दलित समाजाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी साडेपाच एकर जमीन कसून खाण्यासाठी दिली होती. त्यामध्ये हा समाज संरक्षित कूळ होता. श्रीमंत बापूसाहेब महाराज, श्रीमंत बाळ महाराज, श्रीमंत विक्रमसिंहराजे घाटगे या सगळ्यांच्याच नावावर ही जमीन त्या त्या कालखंडात होती. त्यांनी कधीही या संरक्षित कुळाला त्रास दिला नाही. परंतु जमीन वारसा हक्काने समरजित घाटगे यांच्या नावावर होताच ही जमीन का काढून घेतली? हिम्मत असेल तर यावर बोला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT