कोल्हापूर : आता चाललेली तिकडची भांडणे बघता गोकुळची एकहाती सत्ता असली तरच शेतकऱ्यांचे भले होणार आहे. यामुळे आम्ही पॅनेल करणार आहे. गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी सांगितले.
लढाई जाहीर करताना लढणे हे आमचे कर्तव्य आहे. आमची निवडणूक गोकुळच्या स्वाभिमानासाठी आहे. साडेपाच लाख शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे. निवडणूक बिनविरोधाबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. निवडणुकीशिवाय शेतकरी कोणाच्या बाजूने आहेत हे कळणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर : अवसायनातील दूध संस्था प्रतिनिधींनी शुक्रवारी दिवसभर सहायक निबंधक कार्यालयावर ‘वॉच’ ठेवला. सुमारे ४० संस्था प्रतिनिधी कार्यालयाबाहेर सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत थांबून होते. दिवसभरात त्यांनी चार ते पाच वेळा सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
‘गोकुळ’च्या प्रारूप मतदार यादीवर हरकत नोंदविण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस होता. दिवसभर हरकती दाखल करण्यासाठी संस्था प्रतिनिधींची ये-जा सुरू होती. मात्र, सुमारे चाळीसभर प्रतिनिधी येथे दिवसभर थांबून असल्याचे निदर्शनास आले. सकाळी त्यांनी ठाकरे यांची भेट घेऊन प्राप्त हरकतींची यादी मिळण्याची मागणी केली; पण आज हरकतींची यादी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. यानंतर अवसायनातील दूध संस्थांचा यादीत समावेश करा, यासह अन्य मागण्यांवरून त्यांनी चार ते पाच वेळा ठाकरे यांची भेट घेतली. प्रतिनिधींनी दिवसभर मारलेल्या ठिय्याची चर्चा रंगली होती.