कोल्हापूर : आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस कोल्हापूर यांच्या वतीने सातारा पोलिस ग्राऊंड व 109 टी. ए. बटालियनच्या वतीने शिवाजी विद्यापीठ अशा दोन ठिकाणी 15 नोव्हेंबरपासून सैन्य भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राधाबाई शिंदे हायस्कूलच्या विस्तीर्ण पटांगणावर शनिवारी रात्री ऐन थंडीत विविध ठिकाणांहून आलेल्या तरुणांनी मैदानावरच मुक्काम केला.
सैन्य भरतीच्या चाचण्यांसाठी शनिवारी सकाळपासूनच विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांतून हजारो तरुण स्वप्नांची शिदोरी घेऊन आले आहेत. आर्मीच्या वतीने राधाबाई शिंदे हायस्कूलच्या मैदानावर भरतीसाठी आलेल्या तरुणांची व्यवस्था केली आहे. याठिकाणी मैदानावर लाईटसह स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया सुरू झाल्यावर मैदानावर शिस्तबद्ध आदेशांचे प्रतिध्वनी घुमणार आहेत. उमेदवारांना धावणे, उंच उडी आणि शारीरिक क्षमता चाचण्यांतून जावे लागणार आहे. अनेकांच्या तरुणांच्या चेहर्यावर उत्साह आणि थोडीशी तणावाची छटा होती. देशसेवेची प्रेरणा डोळ्यांत घेऊन उत्कृष्ट कामगिरीसाठी तरुण सज्ज झाले आहेत. भरती प्रक्रियेमुळे संपूर्ण परिसरात देशभक्ती आणि उत्साहाचा माहोल पसरला आहे.