कोल्हापूर : अमृत संजीवनी योेजना, नफ्याची तरतूद, नोकरभरती, अहवाल मुद्रण छपाईतील चुका, पन्हाळा शाखेच्या मुद्द्यावर प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत गुरुजींनी जोरदार गोंधळ घातला. सत्ताधारी-विरोधक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. पहिल्यापासून शेवटपर्यंत गोंधळाचा पाढा कायम राहिला.
प्राथमिक शिक्षक बँकेची 86 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. संचालक राजेंद्र पाटील यांनी स्वागत सुरू करताच विरोधी गटाचे संभाजी बापट यांनी अहवालात 15 ऑगस्ट हा प्रजासत्ताक दिन म्हणून छापले असून दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. यावर चेअरमन यांनी चूक मान्य केली. अहवालातील बाब लक्षात आल्यावर चूक दुरुस्त करून अहवाल पाठविले आहेत. मात्र विरोधकांना खोडलेले वाचण्याची सवयच आहे, असा टोला लगावला. त्यावेळेसपासून गोंधळास सुरुवात झाली.
चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांनी बँकेतील कर्मचारी नियुक्ती, ओटीएस योजना, कर्ज रोखे, स्टाफिंग पॅटर्न, पन्हाळा शाखेबाबत अनेक तक्रारी झाल्याचे सांगितले. यावेळी खाली बसलेल्या सत्ताधारी गटाच्या काही सभासदांनी अलिबाबा चाळीस चोर अशा घोषणा सुरू केल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये शाब्दीक गोंधळ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी 15 विषय 10 मिनिटांत हात उंचावून घोषणा देत मंजूर केले.
आयत्यावेळच्या विषय सुरू झाले. नागेश शिंगारे यांनी डीसीपीएस धारकांसाठी अमृत संजीवनी योजनेतून मिळणारा लाभ कमी आहे मग योजना चांगली कशी, असा सवाल केला. एका सभासदाने बोगस पन्हाळा शाखा दाखवल्याने संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दिलीप पवार यांनी मागील संचालक मंडळाने नोकरभरतीत मढ्याच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याचा आरोप केला. विरोधी गटाचे संभाजी बापट यांनी त्यांच्या हातून माईक हिसकावून घेतला. यावेळी धक्काबुक्की झाल्याने मोठा गोंधळ उडाला. दोन्ही गटाच्या सभासदांना शांत करण्याचा प्रयत्न झाला. गोंधळातच सत्ताधार्यांच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणा देत विरोधी गटाच्या सभासदांनी सभात्याग केला. जवळपास तीन-चार तास सभा चालली.
चेअरमन निंबाळकर यांनी प्रास्ताविकात बँकेचा वार्षिक आढावा सादर केला. ते म्हणाले, बँकेचा व्यवसाय 725 कोटी रुपयांवर गेला असून स्वनिधी, ठेवींमध्ये वाढ झाली आहे. एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. येणार्या काळात सर्व शाखा स्वमालकीच्या करणे, इंटरनेट बँकिंग, सर्व सभासदांचे पगार शंभर टक्के बँकेतून करणे, शाखा विस्तार करण्याचा मानस व्यक्त केला. येणार्या काळात सभासदांना दोन अंकी लाभांश वाटप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. संगीता अस्वले यांनी कधी नाही तेवढी बँकेच्या वार्षिक सभेत महिला सभासदांची उपस्थिती आहे, त्यांना बँकेचा कारभार समजून घेऊ द्या, त्यांचा आवाज दाबू नका, त्यांना बोलू द्या, अशी मागणी केली. यावेळी काही काळ गोंधळ झाला.