कोल्हापूर : कोल्हापुरात फेरीवाल्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत आहे. सध्याचे वास्तव पाहता, फेरीवाल्यांच्या बाबतीत कोल्हापूरची परिस्थिती लवकरच मुंबईसारखी होईल, असे निरीक्षण नोंदवत फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांनी दिले. ‘आताच सावध व्हा,’ असेही खंडपीठाने कोल्हापूर महापालिकेला शुक्रवारी सुनावले.
शहरातील गंजी गल्ली येथील अतिक्रमणाबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायमूर्ती म्हणाले, मुंबईतील लोकांसारखे कोल्हापुरातील लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागू नयेत, यासाठी महापालिकेने तत्काळ कारवाई करावी. महापालिकेच्या वतीने ॲड. अभिजित आडगुळे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, महापालिकेच्या वतीने फेरीवाल्यांसह इतर ठिकाणच्या अतिक्रमण निर्मूलनासाठीचा आराखडा न्यायालयात सादर करण्यात आला. पुढील सुनावणी २१ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
कोल्हापुरात फुटपाथ दिसायचे बंद होतील
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती देशपांडे म्हणाले, शेंडा पार्क येथील खंडपीठाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जात असताना शिवाजी विद्यापीठ परिसरात फुटपाथवर सर्वत्र फेरीवाल्यांच्या हातगाड्या दिसल्या. शहरातही बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती आहे. कोल्हापूर महापालिकेने याची गांभीर्याने दखल घ्यावी; अन्यथा कोल्हापुरातील फुटपाथ दिसायचे बंद होतील. फेरीवाल्यांच्या बाबतीत कोल्हापुरात मुंबईसारखी स्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. दरम्यान, महापालिकेची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी महापालिकेने आम्हाला फेरीवाल्यांवरील कडक कारवाईसाठी आश्वासित केले आहे. लवकरच त्यांच्याकडून कारवाई सुरू होईल, असेही नमूद केले.