किणी: पुढारी वृत्तसेवा: जैन धर्मातील प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या आचार्यपद शताब्दी निमित्त किणी येथे शनिवारी (दि. १२) श्री आचार्यपद महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पालखी व रथोत्सव होणार आहे.
जैन धर्मातील प्रथमाचार्य चरित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराज यांना १९२४ साली विजयादशमी दिवशी समडोळी (जि.सांगली) येथे आचार्यपद बहाल करण्यात आले होते. यामुळे २०२४ हे वर्ष आचार्यपद शताब्दी महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्ताने संपूर्ण भारतभर ठिकठिकाणी असा महोत्सव साजरा केला जात आहे.
किणी येथे प.पू.विदेहसागर महाराज यांचा पावन वर्षायोग सुरू आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महामहोत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता प्रत्येक घरात आचार्य शांतीसागर महाराज यांची प्रतिमा पूजन, नऊ वाजता घरोघरी ध्वजवंदन, दुपारी एक वाजता भव्य पालखी व रथोत्सव होणार आहे. यामध्ये ३६ पालख्या, रथ व घोडे यांचा समावेश असणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री पार्श्वनाथ, श्री कुंथुनाथ, श्री मल्लिनाथ जैन मंदिर समिती, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, जैन युवा मंच व अरिहंत पाठशाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.