कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली आणि नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनलेली गोकुळची निवडणूक जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून चर्चेत असणार्या गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गोकुळशी संलग्न असणार्या संस्थांचे प्रतिनिधी गोकुळचे मतदार असतात. हे प्रतिनिधी ठरविण्याचा अधिकार दूध संस्थांना असतो. दूध संस्था एका व्यक्तीचे नाव मतदानासाठी निश्चित करते, त्यालाच ठराव म्हणतात. हे ठराव संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. साधारणपणे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे ठराव सहायक दुग्ध निबंधकांकडे सादर होतील. त्यानंतर त्या ठरावावर येणार्या हरकती किंवा तक्रारी यावर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी तयार करण्यात येईल.
मे महिन्यामध्ये प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सहकार संस्थांच्या निवडणुकीमध्ये माघारीचा कालावधी नियमाने 15 दिवसांचा आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्जावर येणार्या हरकतींवर सुनावणी होऊन पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येते. त्यानंतर माघारीसाठी मुदत असते. सहकार कायद्यानुसार निवडणुकीत माघारीसाठी पंधरा दिवसांची मुदत द्यावी लागते.