कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कारभाराची माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माहिती घ्यावी, मगच कोल्हापुरात यावे, असे आवाहन चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेतून केले. आ. शिवाजी पाटील यांनी संचालकांना वेळ द्यावी, त्यांनी गोकुळबाबत केलेल्या आरोपांना उत्तर देऊन त्यांची शंका दूर करू, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
चेअरमन मुश्रीफ म्हणाले, गोकुळवर लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. सध्या 1200 दूध संस्थांवरून गोकुळची बदनामी होत आहे. याचा फायदा अन्य दूध संघ उठवतील. यामुळे संघाचे सुमारे 2 लाख लिटर दुधाचे संकलन कमी होऊन मोठे नुकसान होईल. संस्था टिकली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी गोकुळची बदनामी टाळावी.
आ. महाडिक यांच्या फोनची प्रतीक्षा
गोकुळ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, काँग्रेस नेत्यांकडे वेळ मागितली आहे. त्यांच्याकडून अद्याप वेळ मिळालेली नाही. आमदार अमल महाडिक यांना फोन केला होता. त्यावेळी ते केरळमध्ये होते. कोल्हापूरमध्ये आल्यावर फोन करतो, असे ते म्हणाले होते. त्यांच्या फोनची प्रतीक्षा आहे. फोन आला की, भेट घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
किकवी प्रकल्प खरेदी बाजारभावनुसारच
पुण्यातील किकवी प्रकल्प खरेदीवरून तक्रारदार दिशाभूल करत आहेत. ते प्रकल्पाची जी किंमत सांगत आहेत, त्याहून अधिक प्रकल्पावर कर्ज आहे. प्रकल्प खरेदीमध्ये कोणताही भ—ष्टाचार झालेला नाही. बाजारभावानुसारच प्रकल्प खरेदी करणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
हा प्रश्न नेते हाताळतील
गोकुळच्या निवडणुकीवरून महायुतीच्या नेत्यांमध्येच वर्चस्ववाद सुरू आहे, याबाबत बोलताना मुश्रीफ यांनी हा प्रश्न गोकुळचे नेते हाताळतील. संस्था टिकली पाहिजे, अशी आमची भावना आहे. नेत्यांशी चर्चा करून गरज पडल्यास संचालक मंडळ मुख्यमंत्र्यांचीही भेट घेईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.