गुडाळ ( ता. राधानगरी) : पुढारी वृत्तसेवा- कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गट नंबर पाचमधून राधानगरी तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळावे, अशी आग्रही मागणी तुळशी-धामणी खोऱ्यातील कुंभीच्या सभासदांनी केली आहे. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी- कासारी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राधानगरी तालुक्यातील तुळशी- धामणी खोऱ्यातील अनेक गावांचा समावेश आहे.
कारखान्याच्या गट क्रमांक पाचमध्ये राधानगरी तालुक्यातील नऊशेहून अधिक सभासदांचा समावेश आहे. या गटातून चार संचालक निवडून दिले जातात. या गटात पन्हाळा तालुक्यातील पणूत्रे, हरपवडे, वेतवडे, पनोरे आदी काही गावाबरोबरच गगनबावड्यातील गावांचा समावेश होतो. राधानगरी तालुक्यातील गवशी, कोनोली, पाल बुद्रूक, चांदे, कोते, केळोशी, आदी अनेक गावांचा या गटात समावेश होतो.
या गटातून पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील सभासदांना संचालक पदाची संधी मिळत असली तरी राधानगरी तालुका मात्र कारखाना स्थापनेपासून संचालक पदाअभावी सातत्याने वंचित राहिलेला आहे.
कारखाना निवडणुकीत दोन्ही आघाड्याकडून राधानगरी तालुक्यातील सभासदांचा वापर केवळ मतदानापुरता करून घेतला जातो, याची सभासदांना खंत आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या कुंभीच्या निवडणुकीत राधानगरी तालुक्याला संधी देण्याची मागणी होत आहे.