कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’... असा अखंड जयघोष, फुले-चिरमुऱ्यांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तिमय वातावरणात शनिवारी घरगुती बाप्पांना निरोप देण्यात आला. दरम्यान, न्यायालयाचा आदेश व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गणेशमूर्ती कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जित कराव्यात, या प्रशासनाच्या आवाहनाला धुडकावत हिंदुत्ववाद्यांनी नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेले बॅरिकेडस् हटवून गणेशमूर्तीचे विसर्जन थेट पंचगंगा नदीपात्रात केले.
वर्षभर पंचगंगेत जयंती नाला, गटार, ड्रेनेज, कत्तलखाने, विविध उद्योग, साखर कारखाने यांच्या प्रदूषणाबाबत काय उपाययोजना करता, असा सवाल करत गणेशमूर्ती नदीतच सोडल्या. आंदोलनात उदय भोसले, निरंजन शिंदे, गजानन तोडकर, विकास जाधव, अर्जुन आंबी, सौरव निकम, आनंदराव पवळ, अंजली जाधव, शिवानंद स्वामी, विक्रम जरग, प्रशांत पाटील, राजेंद्र तोरसकर आदींनी सहभाग घेतला. यावेळी नदी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
विसर्जन कुंडातही अनेक मूर्ती विसर्जित
पंचगंगा नदी मार्गावर महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या विसर्जन कुंडातही अनेक नागरिकांनी मूर्ती विसर्जित करून निर्माल्य संकलन मोहिमेला प्रतिसाद देत पर्यावरणपूरक उत्सवात सहभाग नोंदविला.
नदी घाटावर जणू जत्रा भरली
उन्हामुळे दिवभर गर्दी तुरळक होती. मात्र सायंकाळी पाचनंतर रात्री ९ वाजेपर्यंत पंचगंगा नदी घाट परिसर आबालवृद्धांच्या प्रचंड गर्दीने अक्षरशः फुलला. यामुळे परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. नदी परिसरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, खेळणी यांसह विविध प्रकारच्या वस्तूंच्या स्टॉल्समुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.