वाशी : जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणात दीर्घकाळ प्रभाव असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व वाशीचे लोकनेते बाबुराव सत्याप्पा हजारे (वय 86) यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या निधनाने धनगर समाजातील एक संयमी, धडाडीचा नेता हरपला, अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता. त्यांच्यावर वाशी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, चार मुली, मुलगा असा परिवार आहे.
बाबुराव हजारे यांचा जन्म एका सर्वसामान्य धनगर कुटुंबात झाला. ग्रामपंचायत सदस्य ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील शिखर संस्थांमध्ये त्यांनी पदे भूषविली होती. काँग्रेस नेते श्रीपतराव बोंद्रे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द काँग्रेसच्या मुशीत झाली. त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत करवीर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, भोगावती साखर कारखान्याचे संचालक, महालक्ष्मी दूध संघाचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांची अंत्ययात्रा वैकुंठ रथातून गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान ग्रामपंचायत प्रशासन, विविध संस्था, राजकीय सामाजिक, कार्यकर्ते, उद्योजक, नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कारावेळी माजी खासदार संजय मंडलिक, ‘गोकुळ’चे माजी चेअरमन विश्वास पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी. ए. पाटील, केरबा पाटील, कुंभी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य राजू सूर्यवंशी, मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे, नागेश पुजारी, अनिल घाडगे, कल्लाप्पा गावडे आदींनी हजारे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, ‘भोगावती’चे माजी व्हा. चेअरमन उदयसिंह पाटील -कौलवकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, डॉ. के. एन. पाटील, बाजीराव खाडे, अशोक कोळेकर, बाबासो सावगावे, मच्छिंद्र बनसोडे, संभाजी गावडे, संजय वाघमोडे, विकास घागरे, प्रा. लक्ष्मण करपे, दत्तात्रय कुंभोजे, सरपंच शिवाजी जाधव- मिठारी, उपसरपंच सागर सावंत, ग्रामपंचायत अधिकारी पी. एम. भोपळे यांच्यासह वाशी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. बाबुराव हे वाशीचे माजी सरपंच आप्पासाहेब हजारे यांचे थोरले बंधू, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताजीराव हजारे यांचे वडील, तर करवीर पंचायत समितीचे सदस्य अमित हजारे यांचे ते चुलते होत.