नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नृसिंहवाडीतील व्यापारी वर्गाकडून साहित्य हलविण्यास आजपासून सुरुवात केली आहे. संपूर्ण दत्त मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर सनकादिक मंदिर परिसरात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. दत्त देवस्थानच्या भैरंभट प्रसादालयात सुमारे दोन फूट पाणी आले असून सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. (Kolhapur Flood Update)
पूरप्रवण भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मात्र २०१९, २०२१ चा अनुभव लक्षात घेता ग्रामस्थांनी साहित्य उंचीवर तसेच सुरक्षित स्थळी ठेवण्यास प्रारंभ केला आहे. बाबर प्लॉट परिसरातील रहिवाश्यांना स्थलांतराच्या सूचना ग्रामपंचायतीकडून देण्यात आल्या आहेत. सरपंच चित्रा सुतार, सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन सरपंच सुतार यांनी केले. (Kolhapur Flood Update)
दरम्यान, महापुराचा धोका टाळण्यासाठी, दत्त देवस्थानकडून मंदिर परिसरात कृष्णा नदीकाठी सुरक्षेच्या दृष्टीने बरिकेट्स लावण्यात आले आहेत. बाहेर गावच्या दत्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा दुपारचा महाप्रसाद स्थगित करण्यात आला आहे. जर पाण्याची पातळी वाढती राहिली. तर श्रींची उत्सवमूर्ती टेंबे स्वामी मठात ठेवण्यात येऊ शकते. दरम्यान, कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील तसेच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी अलमट्टी धरण विसर्गाबाबत मंत्री पातळीवर चर्चा करून नियंत्रण ठेवण्याबाबत तातडीच्या हालचाली करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याबद्दल देवस्थानचे माजी अध्यक्ष विकास पुजारी सागर धनवडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. (Kolhapur Flood Update)
आज पूरग्रस्त भागाची आम्ही पाहणी केली. पाण्याची पातळी वाढती राहिली तर गावातील काही भागात पाणी येऊ शकते. त्यामुळे शासनाने अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्ग बाबत असेच हिप्परगी धरण वजा बंधाऱ्याबाबत कायम नियंत्रण ठेवले पाहिजे.- धनाजीराव जगदाळे, ग्रा. पं. सदस्य