कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली का लावली, याबाबत कोल्हापूरकरांच्या मनात अनेक शंका आहेत. यामुळे याप्रकरणी तत्काळ गुन्हा नोंद करा, सत्य समोर आणा, अशी मागणी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बाधणी व संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली.
(Keshavrao Bhosale Natyagruha )
मंगळवारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. नाट्यगृह सरकारनेच बांधावे आणि त्याकरिता जाहीर केलेला निधी तत्काळ वर्ग करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. नाट्यगृहाला लागलेली आग ही संस्कृतीला लागलेली आग असून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला धक्का देण्याचा हा एक अंक झाला आहे,
असा आरोप करत ही घटना झाल्यानंतर शासन व महापालिका स्तरावर या आगीसंदर्भात चौकशा सुरू झाल्या; परंतु आजपर्यंत ही आग कशामुळे लागली, याचे गृगूढ कायम आहे. यामुळे गुन्हा दाखल करावा. एकही दगड न हलवता अगदी हुबेहूब नाट्यगृह उभा करा, अशी मागणी आर. के. पोवार यांनी केली.
बाबा पार्ट म्हणाले, शासनाच्या पैशाने हे काम झाले पाहिजे. याकरिता जाहीर केलेला निधी तातडीने वर्ग व्हावा.. दिलीप देसाई म्हणाले, इमारत जळली का जाळली, याचा शोध घेतला पाहिजे.
गुन्हा दाखल होऊन चौकशी झालीच पाहिजे. बाबा इंदुलकर म्हणाले, गेली तीन महिने वातानुकूलित यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू होते. घटनेपूर्वी अखेरचे आठ दिवस कर्मचारी ते काम करत होते. या सर्वांकडे चौकशी का केली नाही? महापालिकेने ही माहिती का लपवून ठेवली आहे? विजय देवणे म्हणाले, केवळ जळीत महणून चालणार नाही.
गुन्हा दाखल झाला पाहिजे, पालिकेची सुरक्षा व्यवस्था कुठे आहे? आनंद काळे म्हणाले, ही आमच्यासाठी दुर्दैवी घटना आहे. यावेळी नूतनीकरणासाठी नेमलेल्या आर्किटेक्ट व ठेकेदार यांची नावे जाहीर करा, ती नियुक्ती प्रक्रिया जाहीर करा, आर्किटेक्ट, कन्स्लटंट, ठेकेदार घटनास्थळी येऊन गेले. असल्यास त्याची माहिती जाहीर करा, आग लागल्यानंतर स्मोक डिटेक्टर यंत्रणा व पाणी फवारणी यंत्रणा जी स्वयंचलित असते ती सुरू झाली होती का?
ज्यांनी वातानुकूलित यंत्रणा पुरवली त्यांचा स्थानिक मेकॅनिक या नाट्यगृहाच्या वातानुकूल यंत्रणेचे काम करत होता की नाही? आदींची माहिती द्या, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महादेव पाटील, स्वप्निल पार्टे, फिरोज खान उस्ताद, निरंजन कदम, सुनील देसाई, संदीप घाडगे, बाळा जाधव, सतीश बिडकर, सदानंद सूर्यवंशी, रवींद्र बोरगावकर, महेश जाधव, अशोक सूर्यवंशी, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, लता जगताप, कल्पना शेलार वनिता शिंदे आदी उपस्थित होते