धामोड : राधानगरी तालुक्यातील तळगाव पैकी चाफेवाडी येथील शेतकरी सुभाष तुकाराम कातकर शेतात काम करत असताना अचानक येऊन भटके कुत्रे चावले होते. कुत्रे चावल्याने रेबीज आजार झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुभाष कातकर हे 21 मार्च रोजी गावाजवळील गावंदरी नावाच्या शेतात काम करत होते. यावेळी अचानक कुठून तरी एक भटके कुत्रे घेऊन त्यांना चावले. यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी रेबीज रोगावरील लस घेतली होती. एक मे पासून त्यांना रेबीज रोगाची लक्षणे दिसू लागली.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रथम राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र आजार वाढत चालल्याने त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.