काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सन २०२२-२३ ते २०२४-२५ मध्ये रस्ते विकासकामांसाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात नवे वृक्ष लागवडीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे गेली २ वर्षे पाठपुरावा करूनही नवीन वृक्षलागवड केलेली नाही. यामुळे प्रशासनाने रस्त्यांसाठी वृक्षतोडीचा १० वर्षांचा आराखडा महामार्ग विभागाकडून घ्यावा, या मागणीचे निवेदन पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासमोर रस्ते विकासासाठी करण्यात आलेल्या प्रचंड वृक्षतोडीचा विषय मांडण्यात आला. यावेळी गेल्या १० वर्षांतील रस्ते प्रकल्पासाठी तोडलेली झाडे व त्याबदल्यात लावलेली नवीन झाडे याचा संपूर्ण वृक्ष आराखडा महामार्ग प्राधिकरणाने सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ‘वर्ल्ड फॉर नेचर’चे अभिजित वाघमोडे, निर्मला बेदरे, ताहिर शेख, दिग्विजय शिर्के, परितोष उरकुडे, विदुला स्वामी, सविता साळोखे, सुनील पाच्छापुरे, अरुण सावंत, मयूर बेदरे, फिरोज शेख, राहुल चौधरी उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनात विषय मांडू : आ. सतेज पाटील
सध्या रस्ते प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड व त्याबदल्यात पुन्हा न होणारी वृक्षलागवड हा विषय संपूर्ण महाराष्ट्राभर ऐरणीवर आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात हा संवेदनशील विषय मांडू आणि याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी निसर्गसेवक व पर्यावरणप्रेमींना दिली.