गुडाळ, पुढारी वृत्तसेवा : कोथळीहून वीजपुरवठा करणाऱ्या 33 किलोव्हॅट वाहिनीवर घोटवडे येथे वेळूची दोन बेटे पडल्याने धामोड, आवळी बुद्रुक आणि कसबा तारळे विज उपकेंद्राच्या परिसरातील 50 हून अधिक गावात गुरुवारी (दि.25) दिवसभर वीजपुरवठा बंद राहिल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले. विजपूरवठ्या अभावी दळप गिरण्या, घरगुती विद्युत उपकरणे, टीव्ही, मोबाईल, बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता आवळी बुद्रुक येथील नदी काठावर असलेल्या विद्युत वाहिन्यावर उंबराचे मोठे झाड कोसळून वाहिन्या तुटल्या. येथील वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता सुशांत निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वादळी वाऱ्यात -पावसातच वाहिन्यावरील झाड हटवून तुटलेल्या वाहिन्या जोडण्याचे काम दुपारपर्यंत पूर्ण केले. वीज कर्मचाऱ्यांनी भर पावसात केलेल्या या कामाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. दुपारनंतर श्री. निकम यांच्यासह हे कर्मचारी पुन्हा घोटवडे येथील वेळूची बेटे हलवून विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. दिवसभर अतिवृष्टी,वादळी वारे यामुळे हैराण झालेले ग्रामस्थ वीज पुरवठा बंद असल्याने अधिकच हवालदिल झाले.