कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारपासून जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झाली. मंगळवारी (दि. 22) निवडणुकीची मतदार संघनिहाय अधिसूचना जाहीर होणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. दहाही मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून मतदार संघनिहाय उमेदवारी अर्ज आणि त्याबाबतच्या सर्व प्रक्रियांसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. यासह निवडणूक कामकाजासाठी आवश्यक अर्ज, नमुने आदी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले.
जिल्ह्यातील दहा मतदार संघांसाठी दि. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याकरिता उमेदवारी अर्ज भरण्यास दि. 22 पासून प्रारंभ होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होण्यास आता केवळ पाच दिवसांचा कालावधी आहे. यापैकी दोन दिवस शासकीय सुट्टी आहे. यामुळे निवडणुकीची अधिसूचना तयार करणे, उमेदवारी अर्जाचा नमुना तयार करणे, उमेदवारी अर्जासमवेत द्याव्या लागणार्या विविध अर्ज, नमुने तयार करणे, आवश्यक स्टेशनरी, साहित्य मागवणे, त्यानुसार अधिकारी, कर्मचार्यांचे नियोजन करून तसे आदेश काढणे आदी विविध प्रकारच्या कामांना आजपासून गती आली.
उमेदवारी अर्ज भरण्याबरोबरच प्रचारासाठी वाहने, भित्तिपत्रके, पोस्टर, सभा, बैठका आदींच्या परवानगी मागणीचे अर्ज, ध्वनिक्षेपकाचा वापर, त्याची मागणी करणारे अर्ज, दैनंदिन खर्चाचे सादरीकरणासाठीचे नमुने, शपथपत्रे आदी विविध प्रकारचे अर्ज तयार करण्याचे काम आजपासून सुरू झाले. यासह निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालन तयार करणे, दाखल झालेल्या कागदपत्रांची नोंद ठेवण्यासाठी विविध रजिस्टर्स तयार करणे, जमा झालेली कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक कपाटे, सुरक्षा यंत्रणा आदींचीही तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.
या सर्व कामकाजासाठी अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे कामही आजपासून सुरू झाले. त्यानुसार दिवसभर त्या त्या मतदार संघात अशा अधिकारी, कर्मचार्यांचे नियुक्ती आदेश काढणे, ते त्यांना लागू करणे, त्यानुसार त्यांचे त्याबाबतचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याचीही घाई दिसत होती. मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय अधिकार्यांचे कार्यालय, स्ट्राँग रूम, मतदानादिवशी यंत्रांसह सर्व साहित्य वाटप करणे आणि मतदानानंतर जे पुन्हा जमा करून घेतले जाणारे ठिकाण, मतमोजणी केंद्र आदींबाबतही आवश्यक कामकाज आजपासूनच सुरू करण्यात आले.
दि. 22 ते दि. 29 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. यामध्ये शनिवार दि.26 आणि रविवार दि. 27 या दिवशी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यास सहा दिवसच मिळणार आहेत. त्याद़ृष्टीने संभाव्य गर्दीचा विचार करून कामकाजाचे नियोजन केले जात आहे.