लोकसभा २०२४ च्या निवडणुका तोंडावर आल्याने निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने मदतनीस (व्हाॅलेंटीयर ) म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मागणी केली आहे. निवडणुकीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मागणी मात्र याबाबत शाळा कॉलेज व पालक यांच्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
२०२४ ची लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची चिन्हे आहेत. प्रशासन याबाबत मतदार याद्या तयार करण्यापासून मतदान केंद्रापर्यंत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. बीएलओं कडून अद्यावत मतदार याद्या व इतर निवडणूक कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मागणी हातकणंगले लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्यावतीने केली आहे.
पण याबाबत महाविद्यालय प्रशासन मात्र संभ्रमावस्थेत आहे. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थींची मागणी केल्याने कोणते विद्यार्थी याबाबत पाठवायचे? यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी कोण घेणार ? परवानगी मागितली तर भर उन्हात पालक आपल्या मुलांना मदतनीस (व्हाॅलेंटियर) म्हणून पाठवणार का ? असा प्रश्न शाळा कॉलेजच्या प्रशासनासमोर उभा आहे. तसेच दहावी बारावीचे विद्यार्थी १८ वर्ष पुर्ण झालेले नाहीत. यांना कोणत्या स्वरूपाचे कामे लावणार, याबाबत भत्ता किंवा मानधन दिले जाणार की नाही? याबाबत कोणतीच स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना काय सांगायचे असा प्रश्न शाळा महाविद्यालयाच्या प्रशासनासमोर पडला आहे.
सध्या आमच्या मुलांची महत्त्वाच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना एप्रिल मे महिन्यातील रखरखत्या उन्हात आमच्या मुलांना निवडणूक कामे मदतनीस म्हणून का पाठवायचे? याबाबत कोणता प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण ? अशी प्रतिक्रिया एका पालकांनी दिली आहे.