कुरुंदवाड : Kolhapur Flood : पंचगंगा नदीला महापुर आल्याने शेतीत उसाच्या शेंड्यापर्यंत पाणी पोहचले आहे. त्यामुळे शेतात नेहमी वास्तव्यास असणारे वन्यप्राणी लोकवस्तीत शिरकाव करू लागले आहेत. हेरवाड (ता.शिरोळ) येथील गांधी चौकातील हुक्कीरे वाड्या आज (दि.२) पहाटे कोल्हा दिसून आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
गेल्या आठ दिवसाहुन अधिक काळ शिरोळ तालुक्यातील शेतीत महापूर ठाण मांडून आहे. पंचगंगा नदीने जवळपास हेरवाड गाठले आहे. आज पहाटेच्या सुमारास शेतात पाणी असल्याने भटकंती करत असलेला कोल्हा आपल्या सुरक्षिततेसाठी हेरवाड गावात हुक्कीरे मळ्यात पोहचला. वाड्यातील दरवाजे कोल्ह्याला पाहताच तात्काळ बंद केली. काही युवकांनी कोल्ह्याला हुसकावून लावले. शेतातील वन्यप्राणी लोकस्थितीत महापुरामुळे येऊ लागले आहेत त्यामुळे नागरिकांनी आपल्या जनावरांची व आपल्या स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच रेखा अर्जुन जाधव यांनी केले आहे.