आशिष शिंदे
कोल्हापूर : मलेरियासाठी कारणीभूत ठरणारा प्लाझमोडियम फाल्सीपेरम हा परजीवी स्वतःच्या जुनकीय रचनेत बदल करुन औषधांना चकवा देत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात गेल्या पाच वर्षांत 92 हजार 438 जणांना मलेरियेची लागण झाली असून 114 जणांचा मलेरियामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णवाढीस डासांच्या प्रादुर्भावासह परजीवींमधील जनुकीय बदल कारणीभूस असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
मलेरियाचे रुग्ण 97 टक्क्यांनी कमी झाले, तेव्हा परजीवींच्या संख्येवर प्रचंड दबाव आला. अशा स्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी या परजीवींमध्ये जेनेटिक बॉटलनेक ही प्रक्रिया घडली. यामुळे त्यांच्यातील जनुकीय विविधता घटली असून, केवळ असेच परजीवी शिल्लक राहिले आहेत ज्यांच्यावर सध्याच्या औषधांचा परिणाम होत नाही. विशेषतः केल्च 13 - आर 561 एच नावाच्या एका विशिष्ट जनुकीय म्युटेशनमुळे हा परजीवी सर्वात प्रभावी औषधालाही जुमानत नसल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेतील टेक्सास बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि थायलंड, म्यानमार मधील शोक्लो मलेरिया रिसर्च युनिट यांचा संयुक्त अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
राज्यातही मलेरियाच्या परजीवींच्या जुनकीय रचनेत बदल झाले आहेत का याचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज आहे. केवळ डास निर्मूलनावर भर न देता, परजीवींच्या जनुकीय रचनेवर लक्ष ठेवणे अनिवार्य आहे. जर या स्मार्ट परजीवींचा प्रसार रोखला नाही, तर भविष्यात साध्या मलेरियावर उपचार करणेही कठीण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
मलेरियावर मात करण्यासाठी क्लोरोक्विन आणि आर्टेमिसिनिन ही प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. मात्र, आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी उपचारांचा कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. कोणताही ताप हा हिवताप असू शकतो, त्यामुळे ताप अंगावर न काढता तातडीने तपासणी करून घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मलेरियाच्या चाचण्या आणि उपचार पूर्णपणे मोफत दिले जातात.डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी