कोल्हापूर : जिल्ह्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही. उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. शहरातील क्राँक्रीटच्या अंतर्गत रस्त्यांसाठी 500 कोटींची मागणी केल्याचे दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल - हातकणंगलेच्या (मॅक) पदाधिकार्यांना सांगितले.
‘पुढारी भवन’ येथे शुक्रवारी डॉ. जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पुष्पगुच्छ, शुभेच्छापत्र देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी टोलचा लढा, खंडपीठ, ऊस दरवाढ, मटण दरवाढ यांसह अनेक आंदोलने डॉ. जाधव यांच्या प्रयत्नामुळे यशस्वी झाली. कोल्हापूरच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढीसाठी जनजागृती चळवळ उभी करा. त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी डॉ. जाधव यांना केली.
डॉ. जाधव म्हणाले, शहराला भरघोस निधी यायचा असेल तर लोकसंख्या दहा लाख असणे गरजचे आहे. निधी मिळाला तरच शहराच्या विकासाला गती मिळेल. श्री क्षेत्र जोतिबा, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकासासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यासाठी 1400 कोटींचा निधी शासनाने दिला आहे. आयटी पार्कचा प्रश्नही सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. कोल्हापूरची विमानसेवा अजून गतिमान होणे गरजेचे आहे.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, संजय पेंडसे, भावेश पटेल, अनिल जाधव, गोरख माळी, संगमेश पाटील, संजय थोरवत, संस्था सेक्रेटरी शंतनू गायकवाड उपस्थित होते.