राशिवडे : आठ दिवसांपूर्वी त्याची ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली. पुढील परीक्षांची तयारीही सुरू होती, घरात आनंदी वातावरण होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्याला डेंग्यूची लागण झाली. उपचारासाठी जाताना तो ठणठणीत होता. मात्र आठ दिवसांच्या तापाने त्याचा बळी घेतला आणि त्याच्यासह घरच्यांचेही स्वप्न अधुरे राहिले. ही हृदयद्रावक कहाणी आहे, राशिवडे बु. (ता. राधानगरी) येथील अथर्व संतोष निल्ले या वीस वर्षांच्या युवकाची.
अभ्यासासह खेळामध्ये हुशार असणाऱ्या अथर्वने ‘अग्निवीर’ची तयारी सुरू केली होती. एकुलत्या एक मुलाची धडपड पाहून आई-वडिलांनीही पाठबळ दिले. चार-पाच दिवसांपूर्वी ‘अग्निवीर’च्या यादीत त्याचे नाव लागले. त्यानंतर पुढील परीक्षांची तयारी सुरू झाली, पण त्याला अचानक डेंग्यूची लागण झाली.
उपचारासाठी बुधवारी दुपारी भोगावती येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जाताना तो काही अंतर चालत गेला होता, पण याठिकाणी तब्येत ढासळल्याने कोल्हापूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले, पण गुरुवारी दुपारी अथर्वने अखेरचा श्वास घेतला. एकुलत्या एक अथर्वच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे निल्ले कुटुंबीय नव्हे तर मित्रपरिवारासह गाव हळहळले. त्याच्या पश्चात वडील, आई, बहीण, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे.