बिरू व्हसपटे
शिरढोण :अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धाडी टाकून भेसळ करणाऱ्या यंत्रणांचे धाबे दणाणून सोडले असताना, आता याच विभागाने शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेची व संभाव्य भेसळीचीही विशेष तपासणी करावी, अशी मागणी शिरोळ तालुक्यात जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या ताटात जाणाऱ्या अन्नाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिरोळ तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पोषण आहारात अळ्या, उंदराच्या लेंड्या, दगड-गोटे तसेच इतर घाण आढळल्याच्या घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत. या गंभीर प्रकारांकडे संबंधित शाळा व्यवस्थापन समित्या, शिक्षक वर्ग व पुरवठा यंत्रणेने पुरेसे गांभीर्याने लक्ष न दिल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा आहे.
पोषण आहाराची पोती व पिशव्या ज्या ठिकाणी साठविल्या जातात, तेथे स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र अनेक शाळांमध्ये दिसून येते. उंदीर व घुशींचा वावर, त्यांच्या विष्ठेमुळे अन्नधान्य दूषित होण्याचा धोका वाढत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची भावना पालकांत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासण्या करून पोषण आहारातील अन्नधान्याचे नमुने तपासावेत, साठवणुकीची पाहणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
अन्नसुरक्षा हीच खरी परीक्षा शालेय पोषण आहार हा लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आधार आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री तपासणी न करता अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे अचानक पाहण्या कराव्यात. अन्नधान्याची गुणवत्ता, साठवणूक आणि वितरण प्रक्रिया पारदर्शक ठेवून विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार पोषण आहार मिळेल, याची खात्री करून कारवाई करावी अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.विश्वास बालीघाटे,सामाजिक कार्यकर्ते शिरढोण