जयसिंगपूर : राज्यातील शेतकर्यांसाठी 2026-27 च्या हंगामाकरिता पीक कर्जाचे नवीन दर निश्चित करण्यात आले असून, बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. वाढती महागाई, बियाणे, खते आणि मजुरीच्या खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन राज्य सरकारने विविध पिकांच्या कर्ज मर्यादेत 10 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेषतः, कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस पीक असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
नव्याने निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार, सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकर्यांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे. सोयाबीन हेक्टरी सुमारे 59,400 रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे. उसाच्या पिकासाठी आता अडीच लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. हळद, मसाला पिकांमध्ये हळदीसाठी 1 लाख 48 हजार 500 रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. इतर पिके बागायत मक्यासाठी 49 हजार 500 रुपये, तर कापसासाठी 85 हजार आणि हरभर्यासाठी 60 हजार रुपये प्रतिहेक्टर मर्यादा निश्चित केली आहे, तर केळीच्या बागा आणि इतर फळबागांच्या कर्ज मर्यादेतही 10 ते 25 टक्क्यांची वाढ सुचविण्यात आली आहे.
का वाढवली कर्ज मर्यादा?
गेल्या काही वर्षांत शेतीसाठी लागणार्या निविष्ठांच्या (बियाणे, खते) किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जुन्या कर्ज मर्यादेत शेतीचा खर्च भागवणे शेतकर्यांना कठीण जात होते. नवीन सुधारित दरामुळे शेतकर्यांकडे पेरणीसाठी पुरेसे खेळते भांडवल उपलब्ध होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो सोयाबीन, कापूस आणि ऊस उत्पादक शेतकर्यांना मोठा आधार मिळणार असून, आगामी हंगामासाठी शेतकरी तयारीला लागला आहे.