कोल्हापूर : आ. संजय गायकवाड यांच्यावरील दखलपात्र गुन्हे तक्रार अर्जाप्रमाणे नोंदवावेत, यासाठी अपर पोलिस अधीक्षक यांना 24 तासांचा वेळ दिला आहे. दखलपात्र गुन्हे नोंद न झाल्यास सोमवारी (दि.27) सकाळी 10.30 वाजता गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पुरोगामी कार्यकर्त्यांनी दिला. मागण्यांचे निवेदन अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांना दिले.
ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे माजी राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांना आ. गायकवाड यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन पुरोगामी कार्यकर्त्यांनी आ. गायकवाड यांना अटक करण्याचा आग्रह धरला; मात्र पुरोगामी कार्यकर्ते निघून गेल्यावर दोन तासांमध्ये पोलिसांनी शब्द फिरवला. हे पोलिसांचे षड्यंत्र नव्हे का? याप्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे पोलीस आ. गायकवाड यांना अटक करत नाहीत, याचा निषेध व्यक्त करतो. संविधानाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यात पोलिस अपयशी ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रशांत आंबी, कॉ. स्मिता पानसरे, गिरीश फोंडे, दिलीप पवार, सीमा पाटील, रघुनाथ कांबळे, सदाशिव निकम, हरिश कांबळे उपस्थित होते.
आ. गायकवाड महापुरुष, महिला व सामान्य माणसाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात, तरीही पोलिस दखलपात्र गुन्हा नोंदवत नाहीत. यामागील बोलविते धनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आहेत. 28 एप्रिलला आ. गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार असून त्यांना वाचवून दाखवावे, असे आव्हान पुरोगामी कार्यकर्त्यांनी दिले.
...तर आ. गायकवाड यांना ठोकून काढू
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी सकाळी प्रशांत आंबी यांच्या राजेंद्रनगर येथील घरी भेट दिली. आ. गायकवाड प्रसिद्धीसाठी फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही. आंबी यांच्या केसाला धक्का लागला, तर आ. गायकवाड यांना ठोकून काढू, असा इशारा त्यांनी दिला.